भारताचा ‘जलप्रहार’? झेलमच्या रौद्र पाण्याने पाकिस्तानात हाहाकार;

विशेष/प्रतिनिधी: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित करत पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक झालेल्या वाढीमुळे पाकव्याप्त काश्मीर मध्ये मोठा पूर आला असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. पाकिस्तानने भारतावर आरोप केला आहे की, कोणतीही पूर्वसूचना न देता भारताने उरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी झेलम नदीत सोडले.
पीओकेमध्ये पूरजन्य हाहाकार
झेलम नदीच्या वाढत्या पाण्याने मुझफ्फराबाद आणि चकोटी भागात हाहाकार माजवला आहे. स्थानिक प्रशासनाने लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि नदीच्या आसपासच्या भागांतून स्थलांतर करण्याचा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थिती जाहीर करून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानची तळमळ
भारताने सिंधू जल कराराच्या अंमलबजावणीवर तात्पुरता ब्रेक लावल्याने पाकिस्तानमध्ये चिंता आणि गोंधळ वाढला आहे. पाकिस्तानच्या माध्यमांनी असा आरोप केला आहे की, झेलम नदीत अचानक पाणी सोडल्याने १९६० च्या सिंधू जल कराराचे उल्लंघन झाले आहे.
दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पाकिस्तानकडे जाणारे पाणी थांबवण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली. अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारचा स्पष्ट निर्धार आहे की, पाकिस्तानला भविष्यातील कोणतेही जलस्रोत सहज उपलब्ध होऊ देणार नाही.
पाकिस्तानकडून सावध प्रतिक्रिया भारताच्या कडक धोरणामुळे घाबरलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितले की, “पहलगाम हल्ल्याच्या प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करण्यात आम्ही सहकार्य करू इच्छितो. पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाचा निषेध केला आहे.”