रेल्वे भरपाई गैरव्यवहार: न्यायाधीश-वकिलांनी कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा ईडीचा आरोप
हा घोटाळा रेल्वे दावा न्यायाधिकरणातील सर्वांत मोठ्या गैरव्यवहारांपैकी एक मानला जात आहे

नवी दिल्ली : रेल्वे अपघात आणि जमीन नुकसानभरपाईच्या दाव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. न्यायाधीश आणि वकिलांच्या संगनमताने १०.२७ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) २४ मालमत्ता जप्त केल्या असून, त्यांची एकूण किंमत ८.०२ कोटी रुपये इतकी आहे. या मालमत्ता पाटणा, नालंदा, गया आणि नवी दिल्ली येथे असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.
ईडीने या प्रकरणी पाटणा येथील विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली असून, वकील विद्यानंद सिंह आणि इतर आरोपींना दोषी ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे. रेल्वे दावा न्यायाधिकरणात (Railway Claims Tribunal) फसवणुकीचा हा मोठा घोटाळा उघड झाला आहे.
Sunita Williams Return: सुनीता विल्यम्स यांची सुरक्षित घरवापसी, ७ मिनिटांचा ब्लॅकआऊट, १९०० डिग्री तापमान…
कसा झाला गैरव्यवहार?
- वकील दावेदारांच्या नावाने बनावट बँक खाती उघडत असत.
- न्यायाधीशांच्या मदतीने कोर्टाचा निकाल दावेदारांच्या बाजूने लावला जात असे.
- दाव्याची भरपाई बनावट खात्यांत वळवून मोठा हिस्सा वकिलांनी स्वतःच्या खात्यात वळता केला.
- मूळ दावेदारांना फसवून त्यांना फक्त थोडीच रक्कम दिली जायची.
- यासाठी दावेदारांकडून बँकेच्या कागदपत्रांवर सही आणि अंगठ्याचे ठसे घेतले जात होते.
- घोटाळ्यात मिळालेल्या पैशांची बायका, नातेवाईकांच्या नावाने मालमत्ता खरेदी, कंपन्यांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग केली गेली.
ईडीची मोठी कारवाई – न्यायाधीशही संशयाच्या भोवऱ्यात
ईडीने न्यायाधीश आर. के. मित्तल यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकले आहेत. तसेच, वकील विद्यानंद सिंह, परमानंद सिन्हा आणि विजय कुमार यांना अटक करण्यात आली आहे. सध्या हे सर्व कारागृहात आहेत. आता न्यायाधीशांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.