POK मध्ये खळबळ! भारत-पाक संघर्षाची भीती, रहिवाशांना अन्नसाठा करण्याचे आदेश

विशेष / प्रतिनिधी: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत-पाक दरम्यान तणाव वाढला आहे. संभाव्य युद्धाची भीती लक्षात घेता, पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर POK मधील नागरिकांना अन्न, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने साठा करण्याचा आदेश दिला आहे.
सीमेवर गोळीबार; पर्यटन बंद
हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सीमेवर सलग ८ वेळा गोळीबार करण्यात आला असून, भारताने लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिल्यानंतर पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी भारताकडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नीलम व्हॅलीसह सीमेलगतचे पर्यटन बंद करण्यात आले आहे.
POK प्रशासनाची तयारी
पीओकेचे पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचा आदेश दिला.
महत्त्वाच्या निर्णयांमध्ये हे समाविष्ट आहे:
- धार्मिक मदरसे तात्पुरते बंद
- १ अब्ज रुपयांचा आपत्कालीन निधी जाहीर
- नागरी संरक्षण दलांना हाय अलर्ट
- आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक 1122 सक्रिय
वाहतूक सुरू ठेवण्याचे प्रयत्न
झेलम, नीलम, पूंछ, कोटली आणि भिंबरसारख्या संवेदनशील भागांमध्ये रस्ते आणि संपर्क यंत्रणा सुरू ठेवण्यासाठी खास आणि सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत.