रावसाहेब दानवेंची पुन्हा जीभ घसरली; संजय राऊतांचा जोरदार पलटवार
शाब्दिक फटकाऱ्यांचा राजकीय मैदानावर मोठा प्रभाव पडतो

मुंबई/विशेष प्रतिनिधी : भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या काही डायलॉग्स राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या बेधडक आणि परखड भाषणशैलीमुळे अनेकदा वाद निर्माण होतात. कोणताही मुलाहिजा न ठेवता ते थेटपणे बोलतात, त्यामुळे त्यांच्या शाब्दिक फटकाऱ्यांचा राजकीय मैदानावर मोठा प्रभाव पडतो. मात्र, याच पार्श्वभूमीवर त्यांच्या एका वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
“कार्यकर्ते थुंकले तरी विरोधक वाहून जातील” – रावसाहेब दानवे
एका कार्यक्रमात बोलताना रावसाहेब दानवे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांबाबत भविष्यवाणी करत उद्धव ठाकरे यांच्या सेनेची गोळाबेरीज संपली असल्याचा दावा केला. शिवाय, “बुडत्या जहाजात कोण बसतो?” असा खोचक सवाल उपस्थित करत त्यांनी सेनेतील गळतीवर टीका केली.
मात्र, भाजपाच्या संघटन पर्व कार्यशाळेत बोलताना त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, “आमची पार्टी इतकी मोठी आहे की आमचे कार्यकर्ते नुसते थुंकले तरी विरोधक वाहून जातील,” असे विधान त्यांनी केले.
संजय राऊतांचा जोरदार प्रतिउत्तर
दानवे यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. “जनतेने तुमच्यावरच थुंकले आहे,” असे प्रत्युत्तर देत त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. तसेच, “ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच केले होते, त्यांचे थुंकलेले आता का चाटताय?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपाला घरचा आहेर दिला.
वाद पुन्हा पेटणार?
या थुंकीच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून भाजपा आणि शिवसेना (उद्धव गट) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे. यापूर्वीही दानवे यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण गढूळ झाले आहे, त्यामुळे यावेळी हा वाद किती दूरपर्यंत जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.