शिवाजी महाराजांचा खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी जनचळवळ उभारण्याची गरज : दत्ता देसाई
कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर शिबीराचा उत्साहात समारोप

कोल्हापूर(पन्हाळा),राजू मुजावर : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ज्यांच्या राजकारणातील अडथळा आहेत, असे सनातनी छावणीतील लोक शिवाजी महाराजांच्या बदनामीचे कारस्थान रचत आहेत. याला सडेतोड उत्तर देण्यासाठी वेळीच सावध होऊन शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समजून घेऊन, तो नव्या पिढीपर्यंत व्यापक स्वरुपात पोहचविण्यासाठी जनचळवळ उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक दत्ता देसाई यांनी केले. पन्हाळा येथे आयोजित कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर शिबीराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
कोल्हापुरातील श्रमिक प्रतिष्ठान व महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या वतीने पन्हाळा येथील संजीवन इंजिनियरिंग कॉलेजमध्ये आयोजित तीन दिवसीय कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर शिबीराचा आज उत्साहात समारोप झाला.
समारोप सत्राप्रसंगी विचारमंचावर मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. दीपक पवार, शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. अवनिश पाटील, मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. नंदकुमार मोरे, शिबीर संयोजक प्रा.डॉ. मेघा पानसरे व डॉ. मंजुश्री पवार होत्या.
यावेळी बोलताना श्री. देसाई पुढे म्हणाले, पूर्वीच्या काळात सनातनी छावणीतून ‘तुमचा शिवाजी, तर आमचा बाजीराव’ अशी दबक्या आवाजातील कुजबुज कॅम्पेन चालत असे. ही कॅम्पेन आता नव्याने सार्वत्रिक करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. अशावेळी वेळीच सावध राहून महाराजांच्या बदनामीचे मुद्दे खोडून काढण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांचे दैवतीकरण केल्याने त्यांचे अंगभूत कर्तृत्व नाकारले जाते. त्यामुळे शिवाजी महाराज हे माणूस होते; म्हणून मोठे होते, हे लोकांसमोर जाणे आवश्यक आहे.
प्रा. डॉ. दीपक पवार म्हणाले, अलीकडच्या काळात अभ्यासक्रमांमधून खोट्या इतिहासाची मांडणी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. किंबहुना पाठपुस्तकांमधून मोघलांचा इतिहास वगळतानाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासालादेखील नगण्य स्थान देऊन त्यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
प्रा.डॉ. अवनिश पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांच्या समकालीन पत्रांमध्ये समर्थ रामदासांचा कोणताही उल्लेख सापडत नाही. तसेच रामदास भेटीचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. आप्पासाहेब पवार यांनी या वादावर पडदा टाकला असून, रामदास हे शिवरायांचे गुरु नसल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य रामदासांच्या झोळीमध्ये अर्पण केले, हे धादांत खोटे आहे.
इतिहास अभ्यासक डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या, दादोजी कोंडदेवांनी शिवाजी महाराजांचे शिक्षण केले नसून, राजमाता जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांची जडणघडण झाली. तसेच शिवाजी महाराजांच्या जीवनात वाघ्या कुत्र्याचा काडीमात्र संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी शिवाजी महाराजांच्या बदनामीचे षङयंत्र हाणून पाडण्यासाठी युवापिढीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिबीरार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी सुशील लाड, अभय गायकवाड, प्रशांत मगदूम, कबीर पानसरे, श्रेया पांचाळ, निहारिका भोसले, प्रथम नाईक, मुक्ता कांबळे, सावित्री गलांडे, विवेक पोळ, स्मिता पाटील, दिपीका दोड, अलकेश गावित, निशांत कंठे आदींनी परिश्रम घेतले.