छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे सर्वधर्मीयांचे : डॉ. जयसिंगराव पवार
पन्हाळा येथे कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर शिबीराला उत्साहात प्रारंभ

कोल्हापूर (पन्हाळा) /राजू मुजावर : छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य हे केवळ मराठ्यांचे नव्हते, तर सर्वधर्मीयांचे होते. कितीतरी मुसलमान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. अनेक अठरापगड जातीच्या लोकांना शिवाजी महाराजांनी एकत्र आणले आणि त्याला मराठा हे नाव देत स्वतंत्र, सार्वभौम व स्वाभिमानी अशा स्वराज्याची संकल्पना साकारली. ३५० वर्षांहून अधिक काळ गुलामीच्या मानसिकतेत अडकलेल्या मराठ्यांना या मानसिकतेतून बाहेर काढत, मराठ्यांना आत्मदर्शन घडविले.
तसेच मराठ्यांमध्ये महाराष्ट्र धर्म ही विचारसरणी रुजविण्याचे महत्वाचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले, असे प्रतिपादन इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. पन्हाळा येथे आयोजित कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कोल्हापुरातील श्रमिक प्रतिष्ठान व महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्यावतीने पन्हाळा येथील संजीवन इंजिनियरिंग कॉलेजमध्ये ‘शिवाजी महाराज व माझा महाराष्ट्र’ या विषयावर तीन दिवसीय राज्यस्तरीय निवासी प्रबोधन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबाराचे उद्घाटन डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विचारमंचावर शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागप्रमुख प्रा.डॉ. मेघा पानसरे, इतिहास अभ्यासक डॉ. मंजुश्री पवार व सुशील लाड होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला डॉ. पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘शिवछत्रपतींची स्ववराज्याची संकल्पना’ या विषयावर बोलताना डॉ. पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय्य घेऊन कार्य केले.
दरम्यान,त्याकाळात इस्लामी धर्माच्या लोकांची राजकीय सत्ता होती. पण म्हणून त्यांनी कधी इस्लामला आपला शत्रू मानले नाही. शिवाजी महाराज हे जसे पराक्रमी राजे, महान पुरुष होते तसेच ते स्वराज्याचे निर्माते होते. भारताच्या त्याकाळच्या राजनैतिक परिस्थितीचे खरे आकलन शिवाजी महाराजांना झाले होते.
राष्ट्र निर्माण होण्यासाठी राष्ट्रात राहणाऱ्या लोकांमध्ये बंधुभाव असावा लागतो. आम्ही सगळे एक आहोत असे वाटावे लागते. स्वातंत्र्याच्या प्रेरणेतून राष्ट्र निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र धर्माचा, सार्वभौम तत्वाचा परित्याग केल्यानेच नंतरच्या काळात मराठ्यांचे राज्य लयाचा गेल्याचे सांगून, कोणत्याही जाती-धर्मावर आधारित नसलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अवलंबलेल्या राष्ट्रवादाची आज देशाला गरज असल्याचे डॉ. पवार यांनी अधोरेखित केले.
उद्घाटन सत्राच्या प्रारंभी आयटक कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शाहीर कॉ. सदाशिव निकम यांनी आपल्या पहाडी आवाजात शाहीरी पोवाडे सादर करुन छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्यभिषेक दिनानिमित्त अभिवादन केले आणि शिबीरार्थींमध्ये चैतन्य निर्माण केले. दुपारच्या सत्रात प्रा.डॉ. अवनिश पाटील यांनी ‘शिवकालीन महाराष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रा. अभय गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मंजुश्री पवार यांनी प्रास्तविक केले. सुशील लाड यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख प्रा.डॉ. अवनिश पाटील, मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. नंदकुमार मोरे, मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. दीपक पवार, उमेश सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर व शिबीरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
‘शिवाजी कोण होता?’ प्रत्येकाने वाचले पाहिजे
कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी महाराजांचे कार्य घराघरात पोहचावे यासाठी ‘शिवाजी कोण होता?’ या उत्तम पुस्तिकेचे लिखाण केले. छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी कॉ. पानसरे यांचे हे पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे. कॉ. पानसरे हे प्रबोधनासाठी जगले आणि प्रबोधनासाठीच शहीद झाले. ते ज्या तत्वांसाठी लढले ती तत्वे अमर आहेत. जेव्हा देशातील प्रबोधन चळवळींचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची नावे आवर्जून घ्यावी लागतील, असे मत डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून युवक-युवतींचा सहभाग
विद्यार्थी, युवक, युवतींमध्ये विवेकी विचारांचा प्रसार करण्यासाठी सन २०१६ पासून दरवर्षी कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर शिबीराचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या शिबीराला भरघोस प्रतिसाद मिळाला असून, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, पुणे, मुंबई, रत्नागिरी अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थी, युवक, युवतींनी या शिबीरात सहभाग नोंदविला आहे.