शेतकऱ्याला वेठीस धरू पाहिलं, तर त्याला सोडणार नाही -जलसंपदामंत्री विखे-पाटील

विशेष प्रतिनिधी: राज्याचे जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले “शेतकऱ्याला वेठीस धरू पाहिलं, तर त्याला सोडणार नाही” शेतकऱ्यालाही पाणी मिळावे यासाठी सरकार कटीबद्ध असून, ब्रिटिश काळातील प्रवरा उजव्या व डाव्या कालव्यांचे नूतनीकरण युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील दाढ बुद्रुक आणि आश्वी खुर्द येथे कालव्यांच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ विखे-पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना त्यांनी पाणीपुरवठा अडवणाऱ्या घटकांवर कठोर कारवाईचा इशारा दिला.
२० कोटींच्या निधीने कालव्यांचे नूतनीकरण
सुमारे १०० वर्ष जुने हे कालवे जलसंपदा विभागाच्या माध्यमातून आधुनिक केले जात आहेत. नूतनीकरणामुळे गळती रोखली जाईल, पाण्याचा कार्यक्षम वापर होईल आणि शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर पाणी पोहोचेल. या प्रकल्पासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प
विखे-पाटील म्हणाले, “हा प्रकल्प केवळ कालव्यांचे नूतनीकरण नव्हे, तर ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ या महायुती सरकारच्या संकल्पाचा एक भाग आहे.” त्यांनी भंडारदरा आणि निळवंडे धरण प्रकल्पात अधिक पाणीसाठा निर्माण करून गोदावरी खोऱ्यात पाणी वळवण्याचा योजनांचा उल्लेख केला.
“पाणीवाटपात राजकारण नको”
निळवंडे धरणाचे आवर्तन सुरळीत असतानाही काही ठिकाणी अडथळे निर्माण होत असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले. “पाणीवाटपात राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे,” असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के-पाटील, अण्णासाहेब भोसले, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांनीही या नूतनीकरणामुळे आपली शेती बहरणार असल्याची आशा व्यक्त केली.