राजकीय

“कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं का? मी तरी दिलं नाही!” – अजित पवारांचा हात झटकत बचाव, राज्यात नव्या वादाला तोंडफूट


कोल्हापूर/प्रतिनिधी :  “शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? मी दिलं आहे का? मी तरी दिलं नाही!” –  असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीच्या प्रश्नावरून हात झटकत एकप्रकारे जबाबदारीपासून पाय काढल्याचा सूर दिला आहे. कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.

महायुतीने दिलं होतं कर्जमाफीचं वचन, आता मात्र निधीची कारणं
राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी महायुतीने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र सत्तेवर आल्यानंतर निधी नसल्याचं कारण पुढे करत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. यावरून विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे.

अजित पवारांची स्पष्टता की बगल?
कोल्हापुरात बोलताना अजित पवार म्हणाले, “शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं का? मी तरी दिलं नाही!” हे विधान करताना त्यांनी तीनवेळा तेच वाक्य पुनरुच्चारत बचावात्मक भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता आहे.

“लाडकी बहीण” योजनेवर मात्र जोर
अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना सांगितले की, “आदित्य तटकरे यांनी मुद्दा उपस्थित करताच आम्ही तत्काळ नियोजन केलं असून, या योजनेसाठी निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

राजू शेट्टींची मुख्यमंत्री, फडणवीसांवर सडकून टीका
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर कडाडून हल्लाबोल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना “पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांपेक्षाही क्रूर” अशी उपमा दिली. त्यांनी फडणवीसांवरही फसवणुकीचा आरोप करत म्हटलं की, “शेतकऱ्यांच्या लेकरा-बाळांना अनाथ करण्याचं पाप या सरकारने केलं आहे.”

शेती तोट्यात, 3.5 लाख हेक्टर क्षेत्र घटलं
राज्यातील शेतीवर संकटाचे ढग गडद झाले असून, शेतजमिनीचे क्षेत्र 3.5 लाख हेक्टरने घटले आहे. यामागे केंद्र-राज्य सरकारची धोरणं, नापिकी, पिकविमा कंपन्यांची नफेखोरी आणि नैसर्गिक आपत्तींनी शेतकरी मेटाकुटीला आला असल्याचं शेट्टी यांनी पदयात्रेदरम्यान सांगितलं.

नवीन राजकीय वाद वाढणार
अजित पवारांच्या विधानांनंतर, आणि राजू शेट्टी यांच्या सडकून टीकेनंतर, शेतकरी प्रश्नावरून पुन्हा एकदा राज्यात राजकीय रणकंदन होण्याची शक्यता आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button