“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा?” – मनसे नेत्यांचा जोरदार पलटवार

मुंबई /प्रतिनिधी: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर मनसेने जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. “शरद पवारांचे वक्तव्य दुर्दैवी आणि राजकीय सोयीचे आहे,” अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे.
पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी काही प्रश्न उपस्थित करत वक्तव्य केलं होतं.
पवार म्हणाले होते की, “हल्लेखोरांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य केलं आहे का, याबाबत मला खात्री नाही. स्त्रियांना सोडल्याचेही दिसत आहे.” यावर प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं, “पीडित महिलांनी स्वतः सांगितले की टिकल्या काढल्यामुळे आम्ही वाचलो, तरीही शरद पवारांना अजून काय पुरावा हवा आहे? हिंदू म्हणून मारले हे कटू सत्य ते का नाकारतात?”
महाजन यांनी पुढे टीका करताना ठाकरे गटालाही लक्ष केलं. “ज्यांच्या वडिलांनी आयुष्यभर हिंदुत्वाचा पुरस्कार केला, त्या उद्धव ठाकरेंचा एकही खासदार दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीला दिसला नाही, तरीही तुम्ही स्वतःला हिंदूंचे कैवारी म्हणता, हे दुर्दैवी आहे,” असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांच्या अपयशावरही महाजनांनी प्रश्न उपस्थित केले आणि स्थानिक लोकांच्या मदतीनेच दहशतवाद्यांना मार्गदर्शन झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.