Big Breaking : सांगोल्यात भरधाव कारच्या धडकेत वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

सांगोला : सांगोला एका चालकाने भरधाव वेगात गाडी चालवत रस्त्याच्या कडेला बसलेल्या वारकऱ्याला धडक दिल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज ०७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. सांगोला येथील जयनिला हॉटेलजवळ असलेल्या माऊली हॉटेल, मिरज-सांगोला रोडवर घडली. या अपघातात बंडू जाधव (वय ६५ वर्षे, रा. करड्याळ, ता. कागल, जि. कोल्हापूर) या वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची फिर्याद राजेंद्र जाधव (रा. करड्याळ, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांनी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करड्याळ गावातील श्री. विठ्ठल रखुमाई पायी दिंडी भक्त मंडळ, करड्याळ गणेशवाडी यांच्यातर्फे आयोजित चैत्रवारी पायी दिंडी ३० मार्च २०२५ रोजी पंढरपूरकडे निघाली होती. या दिंडीत फिर्यादी राजेंद्र जाधव, त्यांची पत्नी आणि चुलते बंडू जाधव यांच्यासह एकूण ३६ लोक सहभागी झाले होते.
काल, रविवार ०६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी सुमारे ६.४५ वाजता दिंडीतील वारकरी सांगोल्याजवळील माऊली हॉटेलसमोर चहापानासाठी थांबले होते. बंडू जाधव, फिर्यादी आणि इतर वारकरी हॉटेलच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत बसले असताना, अचानक एका भरधाव पांढऱ्या रंगाच्या कारने रस्त्याच्या कडेला येऊन वारकरी बंडू गोपाळ जाधव यांना जोरदार धडक दिली आणि न थांबता पुढे निघून गेली. या अपघातात बंडू जाधव गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सांगोला पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. निष्काळजीपणे वाहन चालवून वारकऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.