वाsss गं वाघीण! हिने केले चक्क २५ लग्न; नवऱ्यांना लुटणारी ‘लुटेरी दुल्हन’ जेरबंद

Fake Marriage : एका महिलेने आतापर्यंत २५ पुरुषांशी लग्न करून त्यांना लुटलं आहे. हे संपूर्ण फसवणूक रॅकेट भोपाळमधून चालवलं जात होतं. या टोळीत महिलांचा मोठा सहभाग होता. हे लोक बनावट एजंटांमार्फत फोटो दाखवून २ ते ५ लाख रुपयांपर्यंत सौदे करत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील सवाई माधोपुरच्या मानटाउन पोलिसांनी तब्बल २५ वेळा लग्न करून नवऱ्यांची फसवणूक करणारी ‘लुटेरी दुल्हन’ अनुराधा हिला अटक केली आहे. प्रत्येक लग्नानंतर काही दिवसांतच ती दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन पसार होत असे.
पोलिसांनी तिच्या अटकेसाठी बनावट ग्राहक बनून सापळा रचला आणि तिला ताब्यात घेतले. ही मूळची उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील आहे. ३ मे रोजी एका तरुणाने तक्रार दिली होती की, एका दलाल आणि महिलेनं लग्नाच्या नावाखाली दोन लाख रुपये उकळले आणि कोर्ट मॅरेज करून दिले. काही दिवसांतच रोख रक्कम, दागिने व मोबाईल घेऊन घरातून गायब झाली.
अलीकडेच तिने अजून एका युवकाशी पुन्हा लग्न केलं आणि त्याच्याकडूनही दोन लाख रुपये घेतले. सध्या पोलिस तिच्याकडून चौकशी करत असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.