लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हप्ता कधी? अजित पवारांचे स्पष्टीकरण; “महिलांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होईल”

कोल्हापूर/प्रतिनिधी: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लाखो महिलांना लागली असतानाच, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर रक्कम खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लवकरच ती पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
” लाडकी बहीण योजनेसंदर्भात नियोजन तयार असून, लाभार्थ्यांना वेळेत पैसे मिळतील याची संपूर्ण काळजी घेतली जात आहे,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
शेतकरी मेळाव्यातून महिलांना दिलासा
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात अडकुर येथे माजी आमदार राजेश पाटील यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
कर्जमाफीवरून रोखठोक भूमिका
कार्यक्रमादरम्यान शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील प्रश्न उपस्थित झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विचारले की, “जमत नाही तर आश्वासन कशाला दिलं?” यावर अजित पवारांनी उत्तर दिलं की, “मी काही आश्वासन दिलं होतं का? मी कधी बोललो आहे का?” असा प्रतिप्रश्न करत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
पीकविमा आणि शेतकऱ्यांबाबतची वचनबद्धता
अजित पवार म्हणाले , “शेतकऱ्यांबद्दल आम्हाला अभिमान आहे. खत आणि पाण्याच्या बचतीसह विविध उपक्रम राबवले जात आहेत. पीकविम्याबाबत निर्णय घेण्यात आला असून, त्यावर कॅबिनेटमध्येही चर्चा झाली आहे.”
राजकीय हिशेब मांडताना चंदगडचा उल्लेख
अजित पवार म्हणाले, “विधानसभेवेळी चंदगडची जागा आमच्या हातून गेली, ही खंत आहे. महायुतीने जिल्ह्यात चांगली कामगिरी केली, पण चंदगडमध्ये बंडखोर उमेदवार विजयी झाला.”
काश्मीर हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया
काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर अजित पवारांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. “दहशतवाद्यांनी केलेला घात न क्षम्य आहे. त्यांचा बदला घ्यावा अशी माझी आणि सर्व भारतीयांची भावना आहे. पंतप्रधान मोदी नक्की योग्य निर्णय घेतील. पीडित कुटुंबियांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणे उभे आहे,”