महाराष्ट्र

कोल्हापुरात अवकाळी पावसाचा दणका!


विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी; शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्यात आज (२५ एप्रिल) पहाटेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरासह हातकणंगले, करवीर, पन्हाळा, शिरोळ आणि इतर भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाल्याची माहिती आहे. या हवामान बदलामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली असून, उभ्या पिकांवर आणि भाजीपाला उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पावसामुळे रस्ते जलमय, वाहतुकीत अडथळे

पहाटे साडेसहा वाजल्यापासून वातावरण ढगाळ झाले आणि काही वेळातच जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी ड्रेनेज, गटारी तुंबून रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.

वीजपुरवठाही खंडित

पावसामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला असून, विजेची अनियमितता जाणवली. हवामान विभागाने पुढील २४ तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात हा अचानक बदल झाला आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. पावसामुळे शेती कामांवर परिणाम झाला असून, अनेक शेतांमध्ये पिकं काढणीसाठी सज्ज होती, तर काही शेतकरी लागवडीची तयारी करत होते. आता या सर्व कामांवर पावसाचा फटका बसला आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकरी आणि नागरिकांना योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले असून, संभाव्य नुकसानीचा आढावा घेतला जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button