“माझ्या नवऱ्याचं लग्न थांबवा”; पहिली पत्नी असताना दुसऱ्याच मुलीशी केला साखरपुडा

विशेष प्रतिनिधी : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असतानाच, पाकिस्तानातील एका महिलेने भारताकडे मदतीची मागणी केली आहे – ही मदत तिने तिचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मागितली आहे. महिलेचा आरोप आहे की तिचा नवरा सध्या मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये राहतो आणि तिला पाकिस्तानात सोडून दिलं असून आता तो दिल्लीतील एका मुलीशी लग्न करण्याच्या तयारीत आहे. इतकंच नव्हे तर त्यांचा साखरपुडा आधीच झालाय.
हा युवक इंदौरमध्ये अनेक वर्षांपासून लाँग टर्म व्हिसावर राहत आहे. पाच वर्षांपूर्वी त्याने कराची येथील निकिता नावाच्या मुलीशी पाकिस्तानात लग्न केलं होतं. एकदा त्याने तिला भारतात आणलं देखील, पण काही काळानंतर परत पाकिस्तानात पाठवलं. महिलेचा आरोप आहे. “त्यानंतर मी सातत्यानं नवऱ्याच्या परतीची वाट पाहत आहे. पण अलीकडेच मला समजलं की त्याने दिल्लीतील एका तरुणीशी साखरपुडा केला आहे आणि लवकरच तिच्याशी लग्न करणार आहे.”
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनिसार, पती-पत्नी दोघेही पाकिस्तानचे नागरिक असल्याने त्यांच्यावर पाकिस्तानी कायदा लागू होतो. दोघांनी कायदेशीर घटस्फोट घेतल्याशिवाय दुसरं लग्न करणं बेकायदेशीर आहे.
अशा परिस्थितीत कराची न्यायालयात आपल्या हक्कासाठी न्याय मागणं हेच योग्य ठरेल. दुसरीकडे, विक्रमला भारत सरकारच्या नियमांनुसार देशातून बाहेर काढलं जावं, असंही मत व्यक्त करण्यात आलं आहे. या प्रकरणात पुढे काय होतं?