“सामाजिक बांधिलकी जपणारे कधीच निवृत्त होत नाहीत” : मा.आम. दिपकआबा साळुंखे-पाटील

सांगोला / प्रतिनिधी: “सामाजिक बांधिलकी जपणारे शिक्षक कधीच निवृत्त होत नाहीत,” असे गौरवोद्गार माजी आमदार आणि विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांनी काढले. प.पू. उदयसिंह देशमुख उर्फ भय्यू महाराज विद्यालयाचे प्राचार्य मनोज उकळे यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी विस्तार अधिकारी लहू कांबळे, उद्योजक बाळासाहेब एरंडे, माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दिपकआबा साळुंखे म्हणाले, “मनोज उकळे यांनी शिक्षक व प्राचार्य म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली. त्यांनी संस्थेचा लौकिक वाढवला, विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आणि शिवप्रेमी व श्रीराम तरुण मंडळांत सक्रीय सहभाग घेऊन सामाजिक कामही केले. अशा लोकांना समाजसेवेची ओढ निवृत्त होऊ देत नाही.”
या प्रसंगी त्यांनी पुढील काळात मनोज उकळे यांना संस्थेच्या निमंत्रित संचालकपदाची जबाबदारी देणार असल्याचेही जाहीर केले.
संस्थेविषयी शिक्षकांची आपुलकी हे आमचे यश – दिपकआबा साळुंखे पाटील कार्यक्रमात बोलताना साळुंखे पाटील यांनी नमूद केले की, “मागील ४० वर्षांत संस्थेच्या अध्यक्षपदाच्या काळात एकाही शिक्षकाने संस्थेविरोधात तक्रार केली नाही. आज शिक्षक निवृत्त होऊनही संस्थेविषयी आपुलकी जपत आहेत, ही आमच्या कार्यपद्धतीची पावती आहे.”