महाराष्ट्रकृषी

गाई-गुरांसाठी नियम कडक, विनापरवाना गोठा चालवल्यास थेट कारवाई

विनापरवाना गाई-गुरे पाळताना आढळल्यास 2,000 रुपये दंड आणि तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा


नाशिक/विशेष प्रतिनिधी : नाशिक महानगरपालिका हद्दीत गाई-गुरे पाळण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. 2025-26 वर्षासाठी परवाना घेण्यासाठी 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीत परवाना नूतनीकरण अथवा नवीन परवाना घेतला नाही, तर संबंधित गोठे धारकांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.

महापालिकेचा कठोर निर्णय

शहरात मोठ्या प्रमाणावर गाई-गुरे पाळली जातात, परंतु अनेक गोठे धारक परवाना न घेता व्यवसाय करत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होतो तसेच शहरात अपघातांच्याही घटना घडतात. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने हा कडक निर्णय घेतला आहे.

विनापरवाना जनावरे पाळल्यास कारवाई

महापालिका हद्दीतील गंगापूर, आनंदवल्ली, मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव, मानूर, वडनेरदुमाला, पिंपळगाव खांब, दाढेगाव, पाथर्डी वडाळा (शिवार), त्र्यंबक खुर्द, कामटवाडे, चुंचाळे, पिंपळगाव बहुला आदी भागांतील गोठे धारकांना परवाना घेणे आवश्यक आहे. जर कोणीही विनापरवाना गाई-गुरे पाळताना आढळल्यास त्यांना 2,000 रुपये दंड आणि तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

परवाना काढण्याची प्रक्रिया

नवीन परवाना अथवा नूतनीकरण करताना मूळ परवाना आणि प्रति जनावर ₹50 अनुज्ञप्ती शुल्क भरावे लागेल.

30 एप्रिलनंतर परवाना नूतनीकरण न केल्यास प्रती जनावर ₹5 विलंब शुल्क आकारले जाईल.

शहरात स्वच्छता सुधारण्यास मदत

अनेकदा शहरभर जनावरे फिरत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि अपघात होण्याची शक्यता वाढते. याशिवाय, योग्य देखभाल न झाल्यास संसर्गजन्य रोग पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे महापालिकेच्या या निर्णयामुळे बेकायदेशीर गोठ्यांचे प्रमाण कमी होईल आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

महापालिकेने सर्व गोठे धारकांना निर्धारित कालावधीत परवाना घेण्याचे आवाहन केले असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट कारवाई केली जाणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button