मोठी राजकीय घडामोड : शरद पवारांचा ‘एकत्र येण्याचा’ इशारा, दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याचे संकेत

मुंबई / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांमध्ये विभाजन झाल्यानंतर प्रथमच पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेचा संकेत दिला आहे. “भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले, तर मला आश्चर्य वाटणार नाही,” असे वक्तव्य शरद पवार यांनी केले राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जुलै २०२३ मध्ये अजित पवारांनी शरद पवारांपासून फारकत घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या आणि न्यायालयातही संघर्ष सुरू आहे. मात्र, शरद पवारांच्या नव्या भूमिकेमुळे संभाव्य एकीचा नवा अध्याय सुरु होऊ शकतो, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.
शरद पवारांनी स्पष्ट केलं की, “आमचे विचार एकसंध आहेत. एक गट अजितसोबत जाण्याच्या बाजूचा आहे, तर दुसरा भाजपपासून दूर राहण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. निर्णय मात्र नव्या नेतृत्वाने घ्यावा.”
शरद पवार म्हणाले , “मी निर्णय प्रक्रियेतून आता थोडा बाजूला झालो आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून भविष्यातील दिशा ठरवावी. त्याचबरोबर खासदार आमच्या विचारांशी एकनिष्ठ आहेत, आमदारांमध्ये काही अस्वस्थता असू शकते,” असेही त्यांनी कबूल केले.
या वक्तव्यानंतर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली. शरद पवारांनी दिलेला आशेचा किरण स्वागतार्ह आहे. मी मध्यस्थीसाठी तयार आहे, पण पवारसाहेब आणि अजित पवार यांचं नातं इतकं जवळचं आहे की मध्यस्थीची गरजही वाटत नाही,” छगन भुजबळ म्हणाले.
शरद पवारांच्या या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. विरोधी पक्षातील एकत्र येण्याची हालचाल की सत्तेची नवी गणितं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.