शासनाच्या सेवा की नागरिकांचा छळ? सांगोला तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह!
तहसील कार्यालयात नागरिकांना अपमानास्पद वागणूक - प्रशासन झोपेत?

सांगोला/विशेष प्रतिनिधी : सांगोला तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून नागरिकांशी होणाऱ्या दुय्यम वागणुकीबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. इन पब्लिक न्यूजशी बोलताना नागरिक म्हणाले, शिधापत्रिका मिळवण्यासाठी किंवा त्यासंबंधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी येथे आलेल्या नागरिकांना अरेरावीने वागवले जात असून, माहिती विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत, असे नागरिकांनी माहिती दिली.
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख याकडे देणार लक्ष ?
तालुक्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख सांगोला तहसील कार्यालयातील नागरिकांना मिळणारी दुय्यम वागणुक,अरेरावी,नाहक त्रास याबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारणार का? नागरिकांचा होणारा नाहक त्रास ते बंद करणार का? जनतेला दिलेले वचन पूर्ण करताना कुचराई होणार का? असे अनेक प्रश्न नागरिकांनी यावेळी उपस्थित केले.
सांगोल्यातील शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकाऱ्याकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ?
शिधापत्रिकेसाठी हेलपाटे : पण काम काहीच होत नाही!
शिधापत्रिका ही आज केवळ अन्नधान्य मिळवण्यासाठीच नाही, तर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दस्तऐवज बनली आहे. त्यामुळे शिधापत्रिकेसंबंधी अडचणी सोडवण्यासाठी सांगोला तालुक्यातील अनेक नागरिक तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात येतात.
- अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांना योग्य माहिती देण्याऐवजी टाळाटाळ करतात.
- नागरिकांना “तुमचे काम झाले आहे. प्रोसेस सुरू आहे. अशी दिशाभूल करणारी उत्तरे दिली जातात.
- अनेकांना ऑनलाइन प्रक्रियेची योग्य माहिती दिली जात नाही, परिणामी त्यांचा वेळ आणि श्रम वाया जातात.
- अनेक नागरिक रोजगार, शेती व इतर कामे सोडून वारंवार कार्यालयात हेलपाटे घालतात, तरीही त्यांची कामे प्रलंबित राहतात.
प्रशासनाचा निष्काळजीपणा : तहसीलदारांनी लक्ष घालण्याची गरज
राज्य शासनाने ऑनलाइन रेशनकार्ड प्रणाली सुरू करून नागरिकांसाठी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न केला असला तरी, प्रशासनाच्या ढिलाईमुळे हा उपक्रम अपयशी ठरत आहे. नागरिकांना अडचणी सोडवण्याऐवजी त्यांच्यावरच दडपशाही केली जात आहे. सांगोला तहसीलदारांनी याकडे तातडीने लक्ष देऊन, संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती शिस्त लावावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून जोर धरत आहे.