आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, १९ ते २५ मे दरम्यान नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबई / प्रतिनिधी: अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या प्रणालीमुळे राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि घाट परिसरात जोरदार सरी कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात १९ ते २५ मे या कालावधीत मुसळधार पावसामुळे काही सखल भागांत पाणी साचणे, अचानक पूरस्थिती निर्माण होणे, कमकुवत झाडे आणि फांद्या कोसळणे, तसेच रस्ते, रेल्वे, विमान आणि बोट वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अशा ठिकाणी आश्रय घेणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
वाऱ्यांचा वेग वाढणार
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर बुधवार आणि गुरुवार (२२-२३ मे) दरम्यान ३५ ते ४५ किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही भागांत हा वेग ५५ किमी/ताशी पर्यंत जाऊ शकतो.
दक्षिण कोकण व गोवा किनाऱ्यावर १९ आणि २० मे, तर उत्तर कोकणात २१ व २२ मे रोजी वाऱ्यांचा जोर अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याने सोमवारी नाशिक, नाशिकचा घाट, अहिल्यानगर, पुणे, पुण्याचा घाट, कोल्हापूरचा घाट, साताऱ्याचा घाट या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांत ५० ते ६० किमी/ताशी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा आहे.
पुण्याचा घाट परिसरात मंगळवारीही ऑरेंज अलर्ट असून कोल्हापूरचा घाट परिसरात गुरुवारपर्यंत अलर्ट कायम राहील.
सावधगिरीचे आवाहन
मेघगर्जनेसह पाऊस होत असताना उंच झाडांखाली थांबणे किंवा मोकळ्या मैदानात उभे राहणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कमी दाबाचे क्षेत्र २२ मे रोजी तयार होऊन उत्तर भारताकडे सरकणार असून त्याच्यामुळे प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.