अजित पवारांची वैष्णवी प्रकरणात भूमिका स्पष्ट; टायरमध्ये घालून मारण्याचे पोलिसांना निर्देश

पुणे/प्रतिनिधी : वैष्णवी हगवणे(Vaishnavi Hagawane Case ) आत्महत्याप्रकरणावरून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. यानंतर हे प्रकरण अधिकच गाजू लागले. मात्र आता अजित पवारांनी स्वत: पुढाकार घेत वैष्णवीच्या वडिलांशी फोनवर संवाद साधत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
“माझ्याजवळ माहिती असती, तर हे लग्नच थांबवलं असतं” : अजित पवार
अजित पवार म्हणाले, “लग्नाच्या वेळी जर मला ही माहिती मिळाली असती, तर मी ते लग्न होऊ दिलं नसतं. मी नेहमीच अन्यायाविरुद्ध उभा राहिलो आहे आणि याही प्रकरणात मी पूर्णपणे वैष्णवीच्या बाजूने आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी सुरुवातीपासूनच पोलिसांना याप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. सध्या मी बारामतीमध्ये आहे, पण पुण्यात आल्यानंतर तुमची प्रत्यक्ष भेट घेईन. मी तुम्हाला एकटा सोडणार नाही,”असा विश्वासही त्यांनी कुटुंबीयांना दिला.
राजकीय आरोपांवर स्पष्ट भूमिका
मागील काही दिवसांपासून अजित पवार यांच्यावर राजकीय हस्तक्षेपाचे आरोप करण्यात येत होते. वैष्णवीच्या लग्नाच्या दिवशी अजित पवार उपस्थित होते आणि त्यांनी हगवणे कुटुंबाला फॉर्च्युनर कारची चावी दिली होती, असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावर स्पष्टीकरण देताना अजित पवारांनी म्हटले, “त्या वेळी संपूर्ण पार्श्वभूमी माहित नव्हती. कोणताही राजकीय नेता अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही, आणि मी तर नक्कीच नाही.”
कुटुंबीयांना मिळणार न्याय?
अजित पवारांच्या या हस्तक्षेपानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात येईल, अशी अपेक्षा वैष्णवीच्या कुटुंबीयांना आहे. याप्रकरणी पोलिस तपास सुरू असून, संबंधित आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे.
ही घटना केवळ एका मुलीच्या मृत्यूपुरती मर्यादित नसून, सामाजिक आणि राजकीय जबाबदारीचा गंभीर मुद्दा ठरली आहे. राज्यातील जनता आणि महिला संघटना आता या प्रकरणाच्या निकालाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.