सवाल जनतेचा : “अहोsss रस्त्यात आहोत की खड्यात?”; जबाबदारीचं भान कुणाला, नेते की अधिकारी?
अधिकाऱ्यांकडून जनतेला उलट धमकी? नागरिकांना म्हणतात ‘तुम्हाला समजत नाही का?’

विशेष वृत्त : पावसाळ्याला सुरुवात होताच सांगोला शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था समोर येऊ लागली आहे. जागोजागी खड्डे यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. नागरिक त्रस्त झाले आहेत. अपघातांचे प्रमाण वाढले आहे, पण जबाबदार प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र श्रेय घेण्यात व्यस्त असल्याचं चित्र दिसून येत आहे.
“काम एकच, पण श्रेय सगळ्यांना हवंच” अशा शब्दांत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. शहरातील ड्रेनेज,नवीन योजना यावर जोर दिला जातोय, पण जी गोष्ट सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जीवनाशी थेट संबंधित आहे ती रस्त्यांची देखभाल. मात्र हे दुर्लक्षितच आहे.
“भर पावसात आम्ही रस्त्यांवरून जाताना कंबरडे मोडून घेतोय. पण “कोणालाच विचारू नये अशा पोस्ट करून नागरिकांना खड्यात घालण्यात व्यस्त आहेत” असा थेट सवाल आता जनतेकडून विचारला जात आहे.

“अहो रस्त्यात आहोत की खड्यात?”; नगरपालिकेच्या हलगर्जी कारभारावर नागरिकांचा संताप
एकदातरी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी शहरात चालत किंवा गाडीवरून फेरफटका मारावा, मग त्यांनाही कळेल आपण रस्त्यावर आहोत की खड्ड्यात!” असा संतप्त सवाल सांगोल्याच्या नागरिकांनी उपस्थित केला आहे. शहरातील रस्त्यांची खिळखिळी अवस्था,खड्डे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे सामान्य जनता धोकादायक रस्त्यांवरून प्रवास करण्यास मजबूर झाली आहे. करसंकलनाच्या वेळी नागरिकांना आठवण करणारे प्रशासन, प्रत्यक्ष अडचणींच्या वेळी मात्र गप्प का, असा सवाल केला जात आहे.

“तुम्हाला एकदाच सांगितलेलं समजत नाही का?” : अधिकारी
या परिस्थितीबाबत काही नागरिकांनी अधिकाऱ्यांना थेट माहिती दिली असता, त्यावर उपाययोजना न करता संबंधित अधिकाऱ्यांकडून उलट दमदाटीच केली गेल्याचा आरोप आहे. “तुम्हाला एकदाच सांगितलेलं समजत नाही का?” अशा स्वरूपाच्या असभ्य प्रतिक्रिया अधिकाऱ्यांकडून दिल्या जात आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
“अशा वृत्तीचे अधिकारी शहराला नको आहेत. जनतेशी असंवेदनशील वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी व त्यांची बडतर्फी करावी,” अशी ठाम मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

सांगोल्यातील वाढता जनआक्रोश आणि प्रशासनाच्या बेपर्वाईची ही गोष्ट केवळ रस्त्यांपुरती नाही, तर लोकशाहीतील उत्तरदायित्वाचा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे.
