एअर स्ट्राईक नंतर पंतप्रधान मोदींचं आज रात्री 8 वाजता राष्ट्राला महत्त्वपूर्ण संबोधन

विशेष प्रतिनिधी: भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. हल्ल्यानंतर मोदींचं हे पहिलं अधिकृत वक्तव्य असणार आहे, त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या भाषणाकडे लागले आहे.
7 मे रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर निशाणा साधत मोठी कारवाई केली होती. या कारवाईनंतर तीनही सैन्य दलांच्या प्रमुखांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत हल्ल्याची माहिती दिली, तसेच भारतीय दलांच्या कारवाईचं समर्थनही केलं. एअर मार्शल ए.के. भारती यांनी भारतीय वायू दल पूर्णपणे तयार असून सर्व पायलट सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज रात्री राष्ट्राला उद्देशून काय बोलणार, विशेषतः पाकिस्तानला काय इशारा देणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य स्थिती तयार झाल्यानंतर आता युद्धविरामाचे संकेत मिळत असून, रविवारपासून सीमेवर शांतता असल्याची माहिती आहे.
दरम्यान, मोदींनी 6 मे रोजी एबीपी न्यूजच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती. त्या वेळी ‘रात्री उशिरापर्यंत काम करण्याचा मानस’ असल्याचं सूचित करत त्यांनी एअर स्ट्राईकची अप्रत्यक्ष झलक दिली होती. मात्र, त्यानंतर गेल्या काही दिवसांत त्यांनी सार्वजनिक मंचावरून कोणतेही वक्तव्य केले नव्हते.
पंतप्रधान मोदींच्या या संबोधनातून भारताची पुढील रणनीती, पाकिस्तानला दिला जाणारा संदेश आणि आतापर्यंतच्या घडामोडींवरील सरकारची भूमिका स्पष्ट होणार आहे.