पालकांनो मुलांचे आधार वेळेवर अपडेट केलंत का? अन्यथा शाळा, बँक आणि योजनांमध्ये अडचणींना सामोरे जावे लागू शकते

विशेष/प्रतिनिधी: आपल्या मुलांचे आधार कार्ड वेळेवर बायोमेट्रिक अपडेट करणे आता केवळ गरजेचेच नव्हे तर बंधनकारकही बनले आहे. ५ आणि १५ वर्षे या दोन वयोगटांमध्ये आधार अपडेट न केल्यास शैक्षणिक प्रवेश, सरकारी योजना आणि बँक व्यवहारांमध्ये अडथळे येऊ शकतात.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या नियमांनुसार, ५ वर्षांच्या आत घेतलेला बाल आधार फक्त पालकांच्या आधारवर आधारित असतो. त्यामुळे मूल ५ वर्षांचे झाल्यावर त्याचे बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन (आयरिस) आणि फोटो यांचा समावेश असलेले पहिले बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे, १५ वर्षांनंतर शरीरात झालेले बदल लक्षात घेऊन दुसरे अपडेट करावे लागते.
का गरजेचे आहे हे अपडेट?
- शाळा आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेताना आधारची अचूकता आवश्यक असते.
- शिष्यवृत्ती, डिजिटल व्यवहार, आणि बँक खाती उघडताना बायोमेट्रिक प्रमाणीकरण लागते.
- अनेक सरकारी योजनांचा लाभ घेताना आधार बंधनकारक असतो.
पहिलं बायोमेट्रिक अपडेट मोफत!
UIDAI कडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ ते ७ आणि १५ ते १७ वयोगटातील पहिले बायोमेट्रिक अपडेट पूर्णतः मोफत आहे. त्यासाठी जवळच्या आधार केंद्रावर भेट द्या. जर नाव, पत्ता किंवा इतर माहिती दुरुस्त करायची असेल तर त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल.
अपॉइंटमेंट कशी घ्याल?
UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर (uidai.gov.in) जाऊन आपल्याला जवळचे आधार नोंदणी केंद्र शोधता येते आणि ऑनलाइन अपॉइंटमेंटही बुक करता येते. यामुळे वेळ वाचतो आणि प्रक्रिया सुलभ होते.
वेळेत अपडेट न केल्यास काय अडचणी?
- शाळा/कॉलेज प्रवेश रखडू शकतो
- सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात अडथळा
- बँक खाते उघडताना किंवा KYC करताना त्रास
- आधार प्रमाणीकरणात त्रुटी येऊन नोकरी/परिक्षा अर्जावर परिणाम
पालकांनी लक्ष द्या!
मुलांचे आधार वेळेवर अपडेट करणे ही एकदा करायची प्रक्रिया आहे, पण त्याचे फायदे दीर्घकालीन आहेत. वेळ वाचवा, अडचणी टाळा आणि आजच अपडेटसाठी पावले उचला.