शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांचं वक्तव्य;

मुंबई/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये गेल्या काही कालावधी पासून सुरू असलेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचं विधान समोर आलं आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज संकेत दिला की, शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात आणि या एकजुटीसाठी सुप्रिया सुळे मध्यस्थी करू शकतात.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याशी मतदारसंघातील विविध समस्या मांडल्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, “भारतीय संस्कृती कुटुंबाच्या एकतेवर भर देते. पवार कुटुंबात मतभेद असले तरीही ते एकच आहे. मला वाटतं की शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं. सुप्रिया सुळे यामध्ये मध्यस्थीची भूमिका बजावू शकतात.”
पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल का? या प्रश्नावर रोहित पवारांनी आशावादी भूमिका घेतली. “काही मतभेद असले तरी कुटुंब एकच आहे. मला वैयक्तिकरित्या वाटतं की हे कुटुंब एकत्र येऊन अधिक ताकदीनं पुढे यावं,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
राम शिंदेंवर रोहित पवारांची टीका
यावेळी त्यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. “कर्जत-जामखेडमधील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मतदारसंघासाठी आवश्यक निधी सरकारकडे अडकलेला आहे. मात्र, राम शिंदे यांच्याकडून या बाबत काहीही ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत,” अशी टीका त्यांनी केली.
“सत्ताधाऱ्यांचा दबावतंत्राचा वापर”
रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षावरही टीका करताना म्हणाले की, “सत्ता वापरून इतर पक्ष फोडले जात आहेत. सत्तेच्या राजकारणामुळे लोकहिताचे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत. हे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारे आहे.”
सुप्रिया सुळे ठरणार का ‘संधीची साखळी’?
रोहित पवार यांच्या वक्तव्यामुळे पवार कुटुंबात पुन्हा एकदा एकजुटीची आशा निर्माण झाली आहे. त्यांच्या मते, सुप्रिया सुळे यांच्याकडे दोन्ही गटांमध्ये संवाद घडवून आणण्याची प्रयत्न करू शकतात. मात्र, अंतिम निर्णय शरद पवार आणि अजित पवार यांच्याच हाती आहे.