सांगोला : पाटील वस्ती (सांगोला) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेले दोन महिने फक्त एकाच शिक्षिकेवर शाळेची जबाबदारी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या संदर्भात पालकवर्ग व नागरिकांनी मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना निवेदन देऊन शाळेत तात्काळ शिक्षक नेमणुकीची मागणी केली आहे.
सदर शाळेत पहिली ते चौथीपर्यंत ३७ विद्यार्थी तसेच बालवाडीमध्ये १५ विद्यार्थी असे एकूण ५२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र सध्या शाळेत केवळ एकमेव शिक्षिका कार्यरत असल्याने सर्व वर्गांचे अध्यापन एकट्याच शिक्षिकेवर पडले आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विपरीत परिणाम होत असून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे, असे पालकांनी निवेदनात नमूद केले आहे.
गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांची तात्काळ बदली करावी : पालक
दरम्यान, पालकांनी याबाबत गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले तसेच केंद्रप्रमुखांकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र बदली पोर्टलवरील त्रुटीमुळे संबंधित शाळेला दुसरा शिक्षक उपलब्ध झाला नसल्याचे समोर आले. अश्या काम चुकार अधिकाऱ्याची बदली करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पालकवर्ग, नागरिकांनी दिले मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना निवेदन
दरम्यान, पालकांनी मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालावे, अशी विनंती केली. मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी तात्काळ गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांच्याशी चर्चा करून शाळेतील परिस्थितीची माहिती दिली. पालकवर्गाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने शिक्षक नेमणूक होणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील
शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, हीच माझी प्राथमिकता आहे. पालकांनी केलेली मागणी रास्त असून मी स्वतः गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले साहेब यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी शाळेला लवकरच कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रश्नावर मी स्वतः लक्ष ठेवून आहे असे ते म्हणाले.
