पाकिस्तान चार भागांत विखुरण्याच्या उंबरठ्यावर?

नवी दिल्ली / प्रतिनिधी: दक्षिण आशियात सध्या घडत असलेल्या घटनाक्रमांमुळे पाकिस्तानमध्ये अंतर्गत मतभेद आणि सामाजिक अस्थिरता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा, सिंध आणि पंजाब या चार प्रमुख भागांमध्ये विद्यमान असलेल्या प्रादेशिक असंतोषामुळे पाकिस्तानच्या अखंडतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा येथे वेगळ्या राष्ट्रासाठी आंदोलने सुरु असून, बलुच लिबरेशन आर्मीसारख्या संघटना पाकिस्तानी सैन्याला थेट आव्हान देत आहेत. तिकडे सिंध आणि पंजाबमध्ये पाण्याच्या हक्कावरून संघर्ष चिघळला असून, सिंधमधील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पंजाब सर्व पाणी अडवून ठेवतो, ज्यामुळे त्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही.
दरम्यान, भारताने सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित केल्याचे संकेत दिल्यानंतर पाकिस्तानात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. भारताच्या झेलम आणि चिनाब नदीतील पाण्याच्या नियंत्रणामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये काही भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे काही भागांत तीव्र पाणीटंचाई जाणवते.
पाकिस्तानी लष्करातही असंतोष वाढल्याचे वृत्त आहे. सुमारे ५००० जवानांनी राजीनामा दिला आहे, तर काही वरिष्ठ अधिकारी देश सोडून गेले आहेत. देशांतर्गत अस्थिरता, आर्थिक संकट आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोंडी यामुळे पाकिस्तान सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
दुसऱ्या बाजूला, भारत ‘इंडिया-मिडल ईस्ट-युरोप कॉरिडोर’च्या माध्यमातून एक नवा व्यापारमार्ग विकसित करत आहे. मुंबई, मुंद्रा आणि हायफा बंदर यांना जोडणाऱ्या या मार्गामुळे भारताचे पश्चिम आशियातील आणि युरोपमधील व्यापारसंपर्क अधिक दृढ होणार आहेत. या प्रकल्पामुळे इराण आणि पाकिस्तानचे पारंपरिक स्थान गमावले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पाकिस्तानमधील परिस्थिती ही तेथील अंतर्गत धोरणात्मक विसंगती, सामाजिक विषमता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील धोरणात्मक अपयशाचे फलित आहे, असे निरीक्षकांचे मत आहे.