Big Breaking : “तीन सिंह एकच गड : राज, उद्धव आणि शिंदेंनी मिळून ‘अखंड शिवसेना’चा रणसंग्राम लवकरच पुकारणार?

मुंबई : राज आणि उद्धवच नाही, तर एकनाथ शिंदेंनीही एकत्र यावं. अखंड शिवसेनेसाठी ही काळाची गरज आहे! अशी भावनिक हाक माजी खासदार आणि जुन्या शिवसैनिक गजानन कीर्तीकर यांनी दिली आहे. कीर्तीकर सध्या एकनाथ शिंदे गटात आहेत, मात्र त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कीर्तीकर म्हणाले, बाळासाहेबांच्या काळात शिवसेना विभाजन नको यासाठी अनेक प्रयत्न झाले. पण आज ‘शिवसेना’, ‘मनसे’ आणि ‘शिंदे गट’ अशी तुकडे झालेली सेना पाहून प्रत्येक खरा शिवसैनिक हळहळतोय. ठाकरे हे एक ब्रँड आहे, आणि तो टिकवण्यासाठी तीनही नेत्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र यायला हवं.
शिंदे, राज आणि उद्धव यांचा ‘त्रिवेणी संगम’ हवा : कीर्तीकर
लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या पक्षासाठी प्रचार करणारे आणि त्यांच्याच उपस्थितीत गटात प्रवेश केलेले कीर्तीकर म्हणतात,मला माहिती आहे की अटी-शर्ती घालण्यात आल्या आहेत. उद्धव म्हणतात राज यांनी महायुती सोडावी, आणि काही जण म्हणतात उद्धव यांनी महाविकास आघाडी सोडावी. पण हे भांडण संपवून एक होणं महत्त्वाचं आहे. कारण आज जे काही गोंधळ आहे, त्यात सामान्य शिवसैनिक भरडला जातोय.
बाळासाहेबांच्या विचारसरणीसाठी एकत्र या : कीर्तीकरांची साद
“बाळासाहेबांचं हिंदुत्व, मराठी माणसाची प्रगती, आक्रमकतेचं राजकारण आणि राष्ट्रवाद – या विचारांवर आधारित शिवसेना आज विखुरलेली आहे. एकनाथ शिंदे या विचारांवरच बाहेर पडले, पण भाजपच्या आघाडीमुळे त्यांनाही मर्यादा येत आहेत,” असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.
‘मी पुढाकार घेईन’ : कीर्तीकर ठाम
मी बाळासाहेबांसोबत शिवसेनेच्या जडणघडणीत सहभागी होतो. आजही मी त्यांची शिकवण अंगीकारतो. त्यामुळे अखंड शिवसेनेसाठी मी स्वतः पुढाकार घेईन, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
“तीन सिंह, एक शिवसेना” : कीर्तीकरांचा नवा फॉर्म्युला
शेवटी कीर्तीकर म्हणाले, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे तिघे जर एकत्र आले, तरच भक्कम शिवसेना उभी राहील. आणि महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी ती वेळ आली आहे.