सोलापुरात नव्या पाईपलाईनचा फटका: लाखो लिटर पाणी वाया, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

सोलापूर/सागर धर्मे : लांबोटीजवळ नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमध्ये मोठा फटका बसला आहे. या पाईपलाईनला अचानक गळती लागल्याने लाखो लिटर पाणी फवाऱ्यासारखं उडून वाया गेलं. आधीच पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या सोलापूर शहरासाठी ही घटना अतिशय धक्कादायक ठरत आहे.
या गळतीमुळे केवळ पाणीच वाया गेले नाही, तर आसपासच्या प्रचंड मातीचा देखील ढिग वाहून गेला आहे. परिणामी, अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, अशा पाईपलाईनच्या कामांमध्ये नेमकी चूक कुठे होते, याचा तात्काळ शोध घेणं गरजेचं आहे. नियोजनातल्या त्रुटीमुळे आमच्यावर संकट कोसळलं आहे.
सोलापूर शहरात दर पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. अशा वेळी लाखो लिटर पाणी वाया जाणं ही गंभीर बाब आहे. पाईपलाईन टाकण्याच्या कामात हलगर्जीपणा झाला का, याची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी आणि स्थानिक नागरिक करत आहेत.