नागपूर : सांगोला नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 1 अ आणि प्रभाग 11 अ जागांची बिनविरोध निवड झाली. या दोन्ही बिनविरोध नगरसेविकांचे आघाडीच्यावतीने आम्ही अभिनंदन करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना विनंती केल्याने सांगोला शहर विकास आघाडीने समन्वयाची भूमिका घेतली त्यामुळेच या बिनविरोध निवडी शक्य झाली.
दरम्यान, शहाजीबापू पाटील यांनी स्वतःची पाठ थोपटून या जागांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये असा सज्जड इशारा आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपताच सांगोला शहर विकास आघाडीतील नेतेमंडळींना एकत्रित घेऊन लवकरच सांगोला येथे सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत असेही यावेळी आजी माजी आमदारांनी स्पष्ट केले.
नगरपरिषद निवडणुकीच्या पूर्वीच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला शहराच्या विकासासाठी सर्वांना एकत्रित येण्याची विनंती केले होती. यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी पालकमंत्र्यांची विनंती धुडकावून लावली आणि निवडणूक प्रचारात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर युतीच्या सर्व मर्यादा सोडून एकेरी भाषेत टीका केली. आज तेच शहाजीबापू निवडणुकीचा निकाल जसा जवळ येऊ लागला तसतसे पालकमंत्र्यांचे गोडवे गात आहेत असेही आवर्जून आजी माजी आमदारांनी नमूद केले.
सध्या दोन्ही आजी माजी आमदार हे सांगोला तालुक्यातील विकासाच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे उपस्थित आहेत. बिनविरोध निवडीच्या पार्श्वभूमीवर बोलताना आजी माजी आमदार म्हणाले, आगामी काळातही सांगोला तालुक्यातील निवडणुकांच्या दृष्टीने आमची आघाडी अभेद्यच राहणार आहे.
शहाजीबापूंनी आमची चिंता करू नये. आज शहाजीबापू पाटील ज्या निर्णयामुळे स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत तोच निर्णय महिन्यापूर्वी त्यांनी घ्यायला हवा होता. सांगोला तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर सर्वांना एकत्रित येण्याची संधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली होती. मात्र तेंव्हा त्यांना सांगोला तालुक्याची आणि शहराची नाही तर स्वतःची काळजी होती स्वतःच्या टक्केवारीचे दुकान सुरू ठेवण्यासाठी त्यांनी सांगोला शहरातील लोकांवर ही निवडणूक लादली.
शहाजीबापूंना भाजपचे वावडे का ? : आमदार बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील
मी स्वतः पुरोगामी विचारांच्या शेतकरी कामगार पक्षाचा आमदार असताना आणि दिपकआबा कोणत्याही राजकीय पक्षात नसताना आम्हाला आमची व्यक्तिगत भूमिका बाजूला ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विनंतीला मान देऊन सांगोला शहराच्या विकासासाठी भाजपसोबत जाण्यासाठी तयार झालो मात्र शहाजीबापू पाटील हे पूर्वीपासून महायुतीत असूनही त्यांना भारतीय जनता पार्टीचे एवढे वावडे कशासाठी आहे ? आम्ही दोघांनी शहराचे हित पाहिले आमचा स्वार्थ बघितला नाही.मात्र बापूंनी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती आबा बनकर यांना टोकाचा विरोध करून स्वतःचा स्वार्थ बघितला असेही यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्पष्ट केले.
शेकाप आणि दिपकआबा हातात हात घालून सोबत राहणार शांत आणि सुसंस्कृत सांगोला तालुक्यात स्व गणपतराव देशमुख आणि दिपकआबा साळुंखे पाटील यांनी अनेक वर्षे विकासाचे राजकारण केले होते. तीच परंपरा यापुढील काळात सुरू ठेऊन येणाऱ्या काळात शेतकरी कामगार पक्ष आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे एकदिलाने हातात हात घालून सांगोला शहर आणि तालुक्यातील राजकारणात सोबत राहणार आहोत.
