CBSEचा कठोर निर्णय, या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही !
डमी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम होणार

नवी दिल्ली : डमी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना धक्का देणारा निर्णय CBSE बोर्डाने घेतला आहे. नियमित वर्गांमध्ये उपस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना १२वी बोर्ड परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा CBSEने दिला आहे.
डमी शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास जबाबदारी पालकांची आणि विद्यार्थ्यांची
CBSEच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, डमी शाळांमध्ये प्रवेश घेऊन नियमित वर्गांना न जाण्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांनाच भोगावे लागतील, आणि त्यासाठी पालकही जबाबदार असतील.
७५% उपस्थिती अनिवार्य, अन्यथा परीक्षा देता येणार नाही
CBSEच्या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान ७५% उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. जर बोर्डाच्या निरीक्षणात एखादा विद्यार्थी नियमित शाळेत उपस्थित नसल्याचे आढळले, तर त्याला बोर्ड परीक्षेसाठी अपात्र ठरवले जाईल.
CET परीक्षेतील रॅकेटचा पर्दाफाश, २२ लाखांची डील करताना चौघे अटकेत
२०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून नवा नियम लागू
अलीकडेच CBSEच्या बैठकीत हा मुद्दा चर्चिला गेला असून, २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू केला जाणार आहे. अशा विद्यार्थ्यांना CBSE परीक्षेसाठी बसण्याऐवजी राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेच्या (NIOS) परीक्षेला बसावे लागेल.
शाळांवरही होऊ शकते कारवाई
CBSEने स्पष्ट केले आहे की, डमी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नोंदवणाऱ्या शाळांवरही शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
CBSEच्या या निर्णयामुळे डमी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हा निर्णय गांभीर्याने घेऊन नियमित उपस्थित राहण्याची खबरदारी घ्यावी, असा सल्ला शिक्षणतज्ज्ञांकडून दिला जात आहे.