भारताचं संरक्षण निर्यातीत मोठं यश; ३०,००० कोटींचं वार्षिक लक्ष्य, १०० देशांमध्ये ‘मेड इन इंडिया’ शस्त्रास्त्रांची निर्यात

विशेष प्रतिनिधी: भारताने संरक्षण निर्यातीच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली असून सध्या १०० देशांमध्ये ‘मेड इन इंडिया’ संरक्षण सामुग्री पाठवली जाते. मागील ११ वर्षांत या क्षेत्रात विक्रमी वाढ झाली असून २०१३-१४ या आर्थिक वर्षात केवळ ६८६ कोटी रुपयांची निर्यात करणाऱ्या भारताने २०२३-२४ पर्यंत ही आकडेवारी २३,६२२ कोटी रुपयांवर नेली आहे.
ही वाढ मुख्यतः परवानगी प्रक्रियेत करण्यात आलेल्या सुलभतेमुळे शक्य झाली आहे. औद्योगिक परवाना प्रक्रिया सध्या खूप सोपी करण्यात आली आहे आणि सुटे भाग (spare parts) निर्यात करण्यासाठी स्वतंत्र परवाना लागत नाही. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या सुधारणांमुळे निर्यातीत आणखी ३४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
संरक्षण मंत्रालयाने २०२९ पर्यंत ५०,००० कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये दारुगोळा, विविध शस्त्रप्रणाल्या, लढाऊ उपकरणांचे सुटे भाग, क्षेपणास्त्रं आणि संरक्षण प्रणालींचा समावेश आहे. मागील आर्थिक वर्षात भारताने ८० देशांमध्ये विविध संरक्षण उत्पादने निर्यात केली आहेत.
DRDOचे माजी अध्यक्ष रवी गुप्ता यांनी नमूद केलं की, भारत आता क्षेपणास्त्रनिर्मितीत आघाडीवर आहे. ब्राम्होससह के-४ आणि के-१५ सारख्या अत्याधुनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून भारताने आपल्या तांत्रिक क्षमतेचा परिचय जगाला करून दिला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून भारत भविष्यातील युद्धसज्जतेसाठीही तयारी करत आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने एप्रिल २०२५ मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण कंपन्यांच्या निर्यातीमध्ये ४२ टक्के वाढ झाली आहे. भारताकडून निर्यात होणाऱ्या प्रमुख संरक्षण साधनांमध्ये बुलेटप्रूफ जॅकेट, डॉर्नियर विमानं, चेतक हेलिकॉप्टर, इंटरसेप्टर बोट्स आणि टॉर्पिडो बोटी यांचा समावेश आहे.
भारतातून सर्वाधिक संरक्षण निर्यात अमेरिका, फ्रान्स आणि आर्मेनिया यासारख्या देशांमध्ये केली जाते. ‘मेड इन इंडिया’ तत्त्वानुसार बनवलेली ही उपकरणं भारताच्या संरक्षण क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याची साक्ष देतात.