महाराष्ट्र

भीषण अपघात: भरधाव कंटेनरने दोन कारला उडवले; पुण्यातील तीन भाविकांचा जागीच मृत्यू


सोलापूर/प्रतिनिधी: अक्कलकोटमार्गे तुळजापूरला जात असलेल्या भाविकांच्या दोन कारना भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व मृत व जखमी पुण्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

ही दुर्घटना चपळगाव येथील पटेल शेताजवळील पुलाजवळ घडली. पुण्याहून आलेले भाविक अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी जात असताना कंटेनरने त्यांच्या वाहनांना समोरून जोरदार धडक दिली.

अपघातातील स्थिती गंभीर; जखमींवर उपचार सुरू

धडकेनंतर अपघात इतका भीषण होता की, एक कार अक्षरशा चकनाचूर झाली. तातडीने स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना अक्कलकोट येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मृतांची नावे अजूनही स्पष्ट नाहीत

या घटनेतील मृतांचा ओळख पटवण्याचे काम सुरू असून, संबंधित कुटुंबीयांना पोलिसांनी माहिती दिली आहे. अपघातानंतर कंटेनरचा चालक फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. घटनास्थळी सध्या पोलीस बंदोबस्त असून तपास सुरू आहे.

भाविकांच्या यात्रेवर काळाचा घाला

स्वामी समर्थ दर्शनानंतर तुळजाभवानी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या यात्रेवर काळाने झडप घातल्याने, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. “एकाच कुटुंबातील तीन जण मृत्यूमुखी पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे,” अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button