यंदा मुसळधार पावसाची शक्यता! मुख्यमंत्र्यांनी दिली दिलासादायक बातमी; खरीप हंगामासाठी राज्य सरकार सज्ज

मुंबई / प्रतिनिधी: राज्यात पावसाच्या आगमनाची प्रतिक्षा संपत आली असून, वळवाच्या पावसाने आधीच हजेरी लावल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळालाय. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत यंदाच्या पावसाळ्याचा अंदाज सादर केला. हवामान खात्याच्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ७ ते १७ टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री, हवामान विभाग, रेल्वे आणि केंद्र सरकारच्या विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्याच्या अनेक भागांत वेळेवर व पुरेसा पाऊस होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पावसात फार मोठे खंड पडणार नाहीत, त्यामुळे खरीप हंगामासाठी हे अतिशय चांगले संकेत आहेत.”
हवामान खात्याचे दीर्घकालीन अंदाज अचूक ठरतात, मात्र अल्पकालीन अंदाजात काही बदल होऊ शकतो. तरीही, यंदा शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाचा अनुभव येईल, अशी अपेक्षा आहे.
खत-बियाण्यांची तयारी पूर्ण
राज्यात खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे आणि खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच, बोगस बियाण्यांच्या तक्रारी टाळण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या ‘साथी’ पोर्टलवर बियाण्यांचे नोंदणी व ट्रॅकिंग करण्याची प्रणाली राबवली आहे.
“हे पोर्टल बियाण्याचे उत्पादन कुठे झाले, याची माहिती देते. यामुळे शेतकऱ्यांना विश्वासार्ह बियाणे मिळतील आणि फसवणुकीला आळा बसेल,” असे फडणवीस यांनी सांगितले.
राज्य सरकारकडून खरीप हंगामासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. पावसाळा समाधानकारक असेल, अशी माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.