‘मिसाईल’ नंतर ‘पाणीबाण’ भारताचा पाकिस्तानला दोन्ही आघाड्यांवर जबरदस्त दणका

विशेष प्रतिनिधी : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात केवळ सैनिकी कारवाईच नव्हे, तर आर्थिक आणि कूटनैतिक पातळीवरही ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच रणनितीचा भाग म्हणून भारताने सिंधू जल करार स्थगित केला असून, आता पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवत ‘वॉटर स्ट्राइक’च्या दिशेने पावले टाकली आहेत.
काल पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात सीमेवरून भारतावर हवाई हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. या हल्ल्याला भारताने यशस्वीरित्या परतवून लावत लाहोर, इस्लामाबाद, कराची, सियालकोट, बहावलपूर, पेशावर आणि कोटली येथील पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे प्रतिहल्ला केला. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानकडून डागण्यात आलेली मिसाईल्स हवेतच निष्प्रभ करत शत्रूला निर्णायक उत्तर दिले.
आज सकाळी भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकत चिनाब नदीवरील सलाल आणि बगलिहार जलविद्युत प्रकल्पांचे दरवाजे उघडले. परिणामी, पाकिस्तानच्या दिशेने जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात मोठी वाढ झाली असून, काही खालच्या भागांत पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. याआधी या धरणांचे गेट बंद ठेवण्यात आले होते, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये पाण्याची टंचाई जाणवत होती.
पाकिस्तानच्या अडचणीत वाढ
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे आधीच जलस्तर वाढलेला असतानाच, धरणांचे दरवाजे उघडल्याने पाकिस्तानच्या बाजूला अचानक पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानसाठी ही आणखी एक गंभीर समस्या ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
भारताने यापूर्वी पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवला असून, आता सागरी, हवाई आणि जलस्त्रोत या तिन्ही आघाड्यांवर दबाव वाढवत बहुआयामी धोरण राबवले जात आहे.