पावसाची मुसळधार हजेरी! मुंबई व कोकणात २ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट

मुंबई / प्रतिनिधी: मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देत हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ, कमी दाबाचे क्षेत्र आणि दक्षिण कर्नाटकजवळील हवामान बदलांमुळे महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अनुभव येण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
या दरम्यान, ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही भागांत वादळी वाऱ्यांसह १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
२२ ते २४ मे दरम्यान मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पालघर परिसरातील समुद्र खवळलेला राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांनी खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.