जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाई भासणार नाही याची दक्षता घ्यावी: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर / प्रतिनिधी: जिल्ह्यात सद्यस्थितीत 6 तालुक्यातील 26 गावांना 32 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्याच्या अन्य ठिकाणाहून टँकर मागणीचे प्रस्ताव आल्यास त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्त स्थळ पाहणी करावी व विहित नियमावलीप्रमाणे तात्काळ निर्णय घ्यावा. तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी टंचाई पाणीटंचाई निवारणार्थ अत्यंत सतर्क राहून काम करावे व एक ही नागरिक पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पाणीटंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, महसूल उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, भूजल चे वरिष्ठ भू वैज्ञानिक श्री. शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे म्हणाले की, टंचाई आराखड्यात प्रस्तावित केल्याप्रमाणे विहीर व विंधन विहीर अधिग्रहण करण्यात यावे. तसेच सद्यस्थितीमध्ये 26 गावांमध्ये सुरू असलेले 32 टँकर तर सुरूच ठेवावेत परंतु अन्य ठिकाणाहून नागरिकांनी टँकर मागणीचे प्रस्ताव दिले असतील तर संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्त स्थळ पाहणी करून त्यावर तात्काळ निर्णय घ्यावा. सर्व उपविभागीय अधिकारी तसेच तालुकास्तरीय यंत्रणांनी एकही गाव, नागरिक यांना पाण्याची टंचाई भासणार नाही यासाठी अत्यंत सतर्कता ठेवून काम करावे असे निर्देश त्यांनी दिले.
सर्व उपविभागीय अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याकडून लघु व मध्यम पाणी प्रकल्पामधील पाणीसाठ्याची माहिती घ्यावी व हा पाणीसाठा किती दिवस पुरेल त्याची सूक्ष्म माहिती घेऊन त्याप्रमाणे काटेकोरपणे नियोजन करावे. सर्व उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग जिल्हा परिषद यांनी नळ योजनेची विशेष दुरूस्ती ची सर्व कामे त्वरित मार्गी लावावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. महसूल उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी टंचाई कृती आराखड्याप्रमाणे टंचाई निवारणार्थ घेण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती बैठकीत दिली.