ऑपरेशन सिंदूर, सुशासन निवडणुका! 25 मे रोजी एनडीएच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी यांची बैठक

नवी दिल्ली : 25 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री परिषद बैठक दिल्लीत पार पडणार आहे. अशोक हॉटेलमध्ये होणाऱ्या या बैठकीत एनडीए शासित 21 राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ मंत्री सहभागी होणार आहेत. बैठकीत सुशासन, नक्षलविरोधी कारवाई, जातीय जनगणना, ऑपरेशन सिंदूर आणि विशेषतः बिहार निवडणुकांवरील रणनीतीवर चर्चा होणार आहे.
बैठकीची सुरुवात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते पंतप्रधानांचे स्वागताने होईल. त्यानंतर पंतप्रधान मोदी सर्व नेत्यांना संबोधित करतील. या बैठकीमुळे राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक न्याय, आणि राजकीय दिशा याबाबत स्पष्टता मिळेल, अशी अपेक्षा आहे. यावेळी ४ ते ५ महत्त्वाचे ठराव देखील मांडले जाण्याची शक्यता आहे.
गती आणि सुरक्षा’ – संतुलित राष्ट्रधोरणाची दिशा
ही बैठक केवळ सुरक्षेपुरती मर्यादित न राहता विकास, सामाजिक समावेश, आणि राजकीय स्थैर्य या मुद्यांवर केंद्रित असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार “जनहित आणि प्रभावी प्रशासन” या तत्वावर काम करत आहे. त्यामुळे हे धोरण राज्यांमध्ये प्रभावीपणे राबवण्याची रणनीती तयार करण्यात येईल.
ही बैठक राजकीय आणि प्रशासकीय दृष्टीने अत्यंत निर्णायक मानली जात आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए कसे एकसंध आणि परिणामकारकपणे पुढे जाते, याचे स्पष्ट संकेत या बैठकीतून मिळू शकतात.