उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य: “सैन्य मोदींसमोर नतमस्तक” विधानावरुन राजकीय वाद

भोपाल / प्रतिनिधी : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशभरातून भारतीय लष्कराचं कौतुक होत आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
भाजपच्या कार्यक्रमात बोलताना देवडा म्हणाले, “या देशाचे संपूर्ण सैन्य, सैनिक आणि जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चरणी नतमस्तक आहे.” हे वक्तव्य समोर येताच सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी देवडा यांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत त्यांच्यावर जोरदार टीका केली.
या आधीही भाजपचे मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करून माफी मागावी लागली होती. आता उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा भाजप अडचणीत आली आहे.
देवडा यांचं म्हणणं काय?
“मोदींनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे पहलगाम हल्ल्याचा बदला घेता आला. देशाची सीमारेषा आज अधिक सुरक्षित आहे आणि त्याचं श्रेय पूर्णपणे पंतप्रधान मोदींना दिलं पाहिजे,” असं स्पष्टीकरण त्यांनी नंतर दिलं.
मात्र, सैन्यासारख्या राष्ट्रीय संस्थेबद्दल “नेतेपुढे नतमस्तक” असल्यासारख्या भावना व्यक्त करणं, हे लोकशाहीच्या अंगाने धोकादायक असल्याचं मत राजकीय आणि सामाजिक स्तरावरून व्यक्त केलं जात आहे.