“ये पप्पा, ये पप्पा…” म्हणतच घेतला अखेरचा श्वास; चिमुकलीच्या मृत्यूने सोलापूर हादरलं,

सोलापूर /प्रतिनिधी: “ये पप्पा, ये पप्पा…” म्हणणारी पाच वर्षांची चिमुकली अचानक गप्प झाली… आणि तिच्या त्या अखेरच्या हाकेनं अख्खं सोलापूर हादरून गेलं. एका निष्पाप मुलीचा अपघाती मृत्यू आणि तिच्या आई-वडिलांचा काळजाचा ठाव घेणारा आक्रोश सध्या संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विजयपूर ते रायचूर पॅसेंजर एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना एका अनोळखी व्यक्तीने रेल्वेत दगड भिरकावल्यामुळे ही चिमुकली गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला दगड लागून रक्तस्त्राव झाला आणि तिला तत्काळ सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
काय घडलं नेमकं?
ही दुर्दैवी घटना टिकेकरवाडी स्टेशनच्या आधी काही किलोमीटरवर घडली. मृत मुलीचं नाव आरोही अजित कांगले (वय ५) असून, कुटुंबासोबत ती यात्रेनिमित्त प्रवास करत होती. तिच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार, “दरवर्षीप्रमाणे आम्ही लच्चन यात्रेसाठी जात होतो. सोलापूरला परतत असताना अचानक डावीकडून जोरात एक दगड आला आणि तो आरोहीच्या डोक्याला लागला.”
आई-वडिलांचा आक्रोश…
रुग्णालयात जेव्हा आरोहीचा मृतदेह बाहेर आणण्यात आला, तेव्हा तिच्या आई-वडिलांचा आक्रोश थांबता थांबेना. “ माझा जीव गेला असता चाललं असतं पण तिला काही व्हायला नको होतं.” आरोहीचे वडील थरथरत बोलत होते. त्यांच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू पाहून डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी देखील अश्रू पुसत होते.
शहरात संताप आणि शोककळा
ही घटना समोर आल्यानंतर सोलापूरमध्ये हळहळ आणि संतापाचं वातावरण आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. अनोळखी व्यक्तीने भिरकावलेल्या दगडामुळे एका कोवळ्या जीवाचा बळी गेला, ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे.
ह्या घटनेमुळे एक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे — प्रवाशांच्या सुरक्षिततेचं काय? रेल्वेमार्गालगतच्या अशा असामाजिक प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील का, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.