विझिंजम बंदर भारताच्या सागरी क्षेत्रात मैलाचा दगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी

केरळ / प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळमधील विझिंजम आंतरराष्ट्रीय सागरी बंदराचे भव्य लोकार्पण आज करण्यात आले. ८,८०० कोटी रुपयांच्या खर्चातून उभारले गेलेले हे खोल पाण्यातील बहुउद्देशीय सागरी बंदर भारताच्या सागरी क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल आहे .
कार्यक्रमाला केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन तसेच अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानीही उपस्थित होते. या बंदरामुळे भारताच्या सागरी पायाभूत सुविधांना आंतरराष्ट्रीय दर्जाची चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी दिला.
“आजपासून केरळमधील नागरिकांना देशाबाहेर जाणाऱ्या मालवाहतुकीच्या संधींचा थेट लाभ होईल. विझिंजम बंदरामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील,” पंतप्रधान मोदी म्हणाले.
“सागरमाला योजने अंतर्गत केंद्र सरकार विविध राज्यांच्या सहकार्याने देशातील बंदर प्रणालीला बळकटी देत आहे. भारतातील किनारी राज्ये आणि त्यातील बंदरे भविष्यातील आर्थिक प्रगतीची केंद्रे ठरतील.”
विझिंजम बंदराचे वैशिष्ट्य म्हणजे हे खोल पाण्यातील असे मोजकेच आंतरराष्ट्रीय बंदरांपैकी एक आहे जे जगातील सर्वात मोठ्या मालवाहू जहाजांचे स्वागत करू शकते. “यामुळे भारताची सागरी मालवाहतूक क्षमता तिप्पट होईल,” असेही मोदींनी सांगितले. भारताच्या सागरी व्यापारातील ७५ टक्के माल याआधी परदेशी बंदरांवर अवलंबून होता. त्यामुळे देशाला मोठ्या प्रमाणात महसूल गमवावा लागत होता. विझिंजमसारख्या बंदरामुळे आता तो पैसा देशातच राहील-पंतप्रधान नरेंद्र मोदी.