महाराष्ट्र

मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली ! महापालिकेचा मोठा निर्णय

या प्रणालीच्या मदतीने मुंबईतील एअर क्वॉलिटी इंडेक्स २० ते २२ टक्क्यांनी सुधारला जाऊ शकतो


मुंबई/सहदेव खांडेकर : मुंबईतील वाढत्या हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संभाव्य प्रदूषणकारी घटनांवर आगाऊ सूचना देणारी आधुनिक यंत्रणा लवकरच कार्यान्वित होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) ‘डायनॅमिक मॉडेलिंग सिस्टिम’ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे हवेच्या गुणवत्तेवर सतत नजर ठेवता येईल आणि नियोजनबद्ध उपाययोजना करता येतील.

दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतही प्रदूषण नियंत्रण यंत्रणा

दिल्लीतील प्रदूषण नियंत्रणासाठी यशस्वीपणे वापरली गेलेली हवा गुणवत्ता प्रणाली’ आता मुंबईतही कार्यान्वित केली जाणार आहे. भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था (IITM) यांच्या सहकार्याने ही प्रणाली विकसित केली जाणार असून, यामुळे संभाव्य प्रदूषणाची आगाऊ सूचना मिळेल आणि प्रतिबंधात्मक उपाय करता येतील.

मुंबईत प्रदूषण वाढण्याची कारणे

मुंबईत मोठ्या प्रमाणावर चालू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हवेतील PM 2.5 आणि PM 10 धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. पश्चिमी वाऱ्यांमुळे ही धूळ समुद्राकडे वाहून जाते, पण हिवाळ्यात वाऱ्याचा वेग कमी झाल्यास मुंबई प्रदूषणाच्या धुरक्याखाली अडकते. परिणामी, हवेच्या खालावलेल्या गुणवत्तेचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.

नव्या प्रणालीचा उपयोग आणि खर्च

हे लक्षात घेऊन, मुंबई महानगरपालिकेने ३ कोटी ६५ लाख ३ हजार रुपये खर्च करून ‘डायनॅमिक मॉडेलिंग सिस्टिम’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रणाली २८ सीएएक्यूएमएस केंद्रांमधील डेटा, ७५ लो-कॉस्ट सेन्सर आणि हवामान बदलांवर आधारित अंदाज वर्तवेल.

दिल्लीप्रमाणेच या प्रणालीच्या मदतीने मुंबईतील एअर क्वॉलिटी इंडेक्स २० ते २२ टक्क्यांनी सुधारला जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे मुंबईत पहिल्यांदाच ‘एअर क्वालिटी अॅडव्हायजरी सिस्टिम’ कार्यरत होणार आहे.

खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला चाप ! सुप्रीम कोर्ट म्हणाले…

हवेच्या गुणवत्तेवर उच्च न्यायालयाचेही लक्ष

मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), IITM आणि BMC यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हिवाळ्यात हवेची गुणवत्ता मध्यम ते खराब असल्याचे नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाने सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होऊ नये म्हणून त्वरित उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत.

नव्या यंत्रणेमुळे नागरिकांना होणारे फायदे

प्रदूषण रोखण्यासाठी आगाऊ सूचना मिळेल.

हवेच्या गुणवत्तेवर सातत्याने नजर ठेवता येईल.

स्वच्छ हवा सुनिश्चित करण्यासाठी वेळीच पावले उचलता येतील.नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button