मोठा निर्णय! लग्न झालेल्या मुलीलाही वडिलांच्या संपत्तीत अधिकार : उच्च न्यायालय मुंबई

मुंबई / प्रतिनिधी: “लग्नानंतर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क राहतो का?” अनेक वर्षांपासून वादाचा विषय ठरलेला हा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या ताज्या निकालामुळे स्पष्ट झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करत मुंबई हायकोर्टाने विवाहित महिलेला वडिलांच्या संपत्तीत हक्क असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
काय आहे प्रकरण
विवाहित महिलेला त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेतील हिस्सा नाकारण्यात आला होता. वडिलांच्या निधनानंतर सातबाऱ्यावर त्यांचं नाव असूनही, चौपदरीकरणासाठी मिळालेल्या नुकसानभरपाईत तब्बल 8 कोटी 58 हजार रुपये त्यांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. विवाह झाल्यामुळे त्यांना हा हिस्सा नाकारण्यात आला होता.
कायदेशीर लढ्याची सुरुवात
याविरोधात विवाहित महिलेने सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, जिल्हा न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध निकाल दिला आणि संपूर्ण रक्कम इतर भागधारकाच्या नावे दिली. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
हायकोर्टाचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटलं की, 1994 च्या घटनादुरुस्तीने आणि वारसा हक्क कायद्याने लग्न झालेल्या मुलीला देखील वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार दिला आहे. विवाहामुळे तिचा वारसाहक्क संपुष्टात येत नाही.
त्यामुळे, सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करत हायकोर्टाने विवाहित महिलेला त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत पूर्ण अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुलींच्या हक्कांचा विजय
या निर्णयामुळे पुन्हा एकदा लग्न झालेल्या मुलींचे कायदेशीर हक्क अधोरेखित झाले आहेत. भारतीय संविधान व वारसा कायदे हे मुलगा व मुलगी या दोघांनाही समान मानतात. या निर्णयाचा उपयोग भविष्यात अशा अनेक प्रकरणांमध्ये दिशादर्शक ठरेल, यात शंका नाही.