सोलापुरात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत शासकीय जमिनींचे वाटप; जिल्हाधिकारींचे विरोध टाळण्याचे आवाहन

सोलापूर/ प्रतिनिधी: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी शासकीय जमिनी महावितरण कंपनीला ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आल्या आहेत. या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होणार असून, शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज उपलब्ध होणार आहे.
मात्र, काही गावांमध्ये स्थानिक नागरिक, ग्रामस्थ, पत्रकार व सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्यांकडून प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याची माहिती महावितरण कंपनी व संबधित यंत्रणांकडून प्रशासनाला मिळाली आहे.
या गावांमध्ये प्रकल्पाला विरोध
विशेषतः माढा तालुक्यातील माळेगाव, भेड, वडोली; सांगोला तालुक्यातील कटफळ; बार्शी तालुक्यातील सर्जापूर, झाडी आणि अक्कलकोट तालुक्यातील बादलकोट या गावांमध्ये ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडून ठराव न झाल्याचे कारण देत प्रकल्पास विरोध दर्शवला आहे.
प्रकल्पाचे फायदे समजून घ्या – प्रशासनाचे आवाहन
या प्रकल्पातून पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती, शेतकऱ्यांसाठी सवलतीची वीज, आणि दरवर्षी अनुदान स्वरूपात निधी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री यांचा हा फ्लॅगशिप प्रकल्प असल्याने तो वेळेत आणि शांततेत पूर्ण होणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विरोध न करता योग्य माध्यमातून संवाद साधावा
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले की, प्रकल्पास अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. प्रश्न असल्यास संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
शासनाचा इशारा : कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई
प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अडथळा आणल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.