१० वर्षांपासून फडणवीस हेच गृहमंत्री, मात्र महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ : आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल…
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही समाजकंटकांनी छेडछाड केली

मुंबई : राज्यातील महायुती सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठक घेऊन पुढील रणनीतीवर चर्चा केली. या बैठकीत शिवसेना (ठाकरे गट) नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत आदित्य ठाकरे म्हणाले की,गेल्या १० वर्षांपासून फडणवीस हेच गृहमंत्री आहेत, मात्र राज्यातील महिला अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढच होत आहे.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेड
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात संत मुक्ताई यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही समाजकंटकांनी छेडछाड केली. या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. रक्षा खडसे केंद्रीय मंत्री असण्यापेक्षा त्या महिला आहेत, हे लक्षात घ्यायला हवे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
सत्ताधाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
कारवाई फक्त विरोधकांवरच होते का? सत्ताधारी पक्षावर कधी कारवाई होणार? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
ईव्हीएमद्वारे तुम्ही निवडून आला, आता दिलेली वचने पूर्ण करणार का?
शक्ती कायदा राष्ट्रपतींनी परत पाठवला, त्यावर पुढे काय करणार?
महिला सुरक्षेसाठी ठोस पावले उचलणार का?
यासारखे मुद्दे उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महायुतीतील अंतर्गत वादांवरही टीका
महायुती सरकारमधील अंतर्गत संघर्षावर भाष्य करत आदित्य ठाकरे म्हणाले, पालकमंत्री कोण होणार, मालकमंत्री कोण होणार, बंगल्यांसाठी भांडणं सुरू आहेत. सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांपेक्षा सत्ता वाटपाचेच भान अधिक आहे. राज्यात वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधक आक्रमक झाले असून, अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.