“ना आमदार, ना खासदार…” सांगोल्यातील शेतकऱ्यांसाठी वरुणराजा ठरला तारणहार!
शेतकऱ्यांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली, आश्वासनाशिवाय काहीही मिळालं नाही!

सांगोला / प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याअभावी भयंकर संकटाचा सामना करावा लागत असतानाच, रात्री झालेल्या जोरदार पावसाने काहीसा दिलासा दिला. अनेक भागांत तब्बल महिन्यांनंतर जमिनी ओली झाल्या असून, पिकांना जीवनदान मिळाले आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये “ना आमदार, ना खासदार… शेवटी वरुणराजच मदतीला धावला!” अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
तालुक्यातील सिंचनासाठी महत्वाची असणारी टेंभू योजना, निरा उजवा कालवा आणि शिरभावी पाणीपुरवठा योजना गेल्या काही महिन्यांपासून ठप्प असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संकटात सापडले होते. ८१ गावांची शिरभावी योजना बंद असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील हाल सोसावे लागत होते.
याच दरम्यान, रात्री आलेल्या अनपेक्षित पावसाने शेतीला थोडीशी चालना मिळाली आहे. पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात करणाऱ्या शेतकऱ्यांनी या पावसामुळे पुन्हा एकदा आशेचा किरण पाहिला आहे. काही ठिकाणी फळबागांना देखील या पावसाचा थोडा फायदा झाला आहे.
स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली, परंतु आश्वासनाशिवाय काहीही मिळालं नाही, अशी नाराजी व्यक्त केली जात आहे. “ज्यांच्याकडे आमचा प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आहे, ते केवळ निवडणुकीपुरतेच दिसतात,” असे टोमणेही गावकऱ्यांकडून ऐकायला मिळत आहेत.
पावसाचा जोर काही ठिकाणी जास्त असल्यामुळे स्थानिक प्रशासनानेही खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शेतकऱ्यांची प्रमुख मागणी अजूनही सिंचन योजनांच्या कार्यान्वयनाकडे आहे.