सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवा; राधाकृष्ण विखे पाटील यांचा आदेश

पुणे/प्रतिनिधी: पुण्याला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला, वरसगाव आणि पानशेत धरण क्षेत्रातील सरकारी जमिनीवरील बेकायदा अतिक्रमण तत्काळ हटवावे, तसेच धरणांमध्ये सांडपाणी व मैलापाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.
धरण क्षेत्रांची पाहणी व आढावा बैठक
जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी पानशेत, वरसगाव व टेमघर धरणांची पाहणी केली. वरसगाव येथे आगमनानंतर दीड तास त्यांनी वरसगाव आणि पानशेत धरणांची पाहणी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत बैठकीत अतिक्रमण, सांडपाणी आणि धरण क्षेत्रातील समस्यांवर सविस्तर चर्चा झाली.
धरण परिसरातील गाळ हटवण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करणे व पुढील कार्यवाही करण्याच्या सूचनाही जलसंपदा मंत्र्यांनी दिल्या.
अतिक्रमणावर कठोर कारवाईचा इशारा
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी सांगितले की, जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानुसार खडकवासला साखळीतील सर्व धरण क्षेत्र तसेच मुठा कालव्यावरील अतिक्रमणांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अतिक्रमण धारकांना आधीच सूचित करण्यात आले आहे. जर त्यांनी अतिक्रमण स्वयंस्फूर्तपणे काढले नाही, तर धडक मोहीम राबवून ती जमीनदोस्त केली जाईल.
धरणातील गाळामुळे साठवण क्षमतेवर परिणाम
गाळ साचल्याने धरणातील पाणी साठवण क्षमता घटत चालली आहे. त्यामुळे पानशेत व वरसगाव धरणांमध्ये गाळाच्या प्रमाणाचे सर्वेक्षण करून, त्याच्या काढणीची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश विखे पाटील यांनी दिले आहेत.
पवना धरणालाही भेट
याशिवाय, विखे पाटील यांनी पवना धरणालाही भेट देऊन धरण सुरक्षेचा, पाणी नियोजनाचा आणि अतिक्रमण व जलप्रदूषणाच्या प्रश्नांचा आढावा घेतला. जलप्रदूषणास जबाबदार असलेल्या व्यक्तींवर सुधारित कायद्याच्या आधारे कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.