मराठीला अभिजात दर्जा, पण विद्यार्थ्यांसाठी ‘कठीण’? दहावीत ३८ हजार ४३७ नापास!

मुंबई / प्रतिनिधी : ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा बहुमान दिला. राज्यभरात जल्लोष झाला, भाषाप्रेमींनी याला ऐतिहासिक मानलं. पण, या गौरवाच्या काही महिन्यांतच एक तितकंच धक्कादायक वास्तव समोर आलंय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत तब्बल ३८ हजार ४३७ विद्यार्थी मराठी विषयात नापास झाले आहेत.
हे आकडे इंग्रजीत नापास झालेल्या ६ हजार ७३८ विद्यार्थ्यांपेक्षा सहापट अधिक आहेत. यावरून स्पष्ट होतं की मातृभाषा समजली जाणारी मराठीच विद्यार्थ्यांना अधिक कठीण वाटते.
शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं की, मराठी माध्यमांच्या शाळांमधीलच बहुतांश विद्यार्थी मराठीत कमी गुण मिळवत आहेत, जे चिंतेचं कारण आहे. मातृभाषेतील लिखाण व व्याकरण हे विद्यार्थ्यांसाठी कठीण का ठरतं, यावर अभ्यास करण्याची गरज शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
भाषातज्ज्ञांचे मत :
“नवीन शैक्षणिक धोरण मातृभाषेला प्राधान्य देत असलं तरी प्रत्यक्ष कृतीशिवाय हे अपुरं आहे. अभ्यासक्रम कठीण नसून शिकवण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांची भाषाविषयक रुची यावर प्रश्न उपस्थित होतो,” असं एका शिक्षणतज्ज्ञाने सांगितलं. राज्य सरकारने मराठी विषयाच्या शिकवण्याच्या पद्धती, विद्यार्थ्यांचे कल, आणि शिक्षकांची तयारी यावर तत्काळ सर्वेक्षण व सुधारणा आराखडा सादर करावा, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे.