१०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता? अफवा खोट्या –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्रातून १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याच्या अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. “ही माहिती पूर्णपणे खोटी आहे. सर्व पाकिस्तानी नागरिकांचे ठिकाण स्पष्ट असून, त्यांना देशाबाहेर पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे. कोणत्याही नागरिकाला व्हिसा मुदत संपल्यानंतर महाराष्ट्रात राहू दिले जाणार नाही,” असे फडणवीस यांनी ठामपणे स्पष्ट केले.
राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची स्थिती
राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांनी सांगितले, सध्या महाराष्ट्रात एकूण ५,०२३ पाकिस्तानी नागरिक आहेत. त्यापैकी सुमारे १,००० नागरिक अल्पकालीन व्हिसावर आले असून, उर्वरित नागरिक दीर्घकालीन व्हिसावर राहत आहेत.
प्रमुख शहरांतील पाकिस्तानी नागरिकांची संख्या:
- नागपूर – २,४५८
- ठाणे – १,१०६
- जळगाव – ३९३
- पिंपरी-चिंचवड – २९०
- नवी मुंबई – २३९
- अमरावती – ११७
- पुणे – ११४
- वसीम – १०६
- छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर – प्रत्येकी ५८
- मीरा-भाईंदर – २६
- अकोला – २२
- रायगड आणि सोलापूर – प्रत्येकी १७
- अहिल्यानगर आणि यवतमाळ – प्रत्येकी १४
व्हिसा कालबद्धता आणि तपासणी सुरू
गृह राज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट केले की, अल्पकालीन व्हिसावर आलेल्या नागरिकांमध्ये वैद्यकीय कारणास्तव आलेल्यांना दोन दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे. मात्र, व्हिसाची मुदत संपल्यानंतर कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला राज्यात राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.
राज्यात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर संशयास्पद नागरिकांची सखोल तपासणी सुरू असून, प्रत्येकाची काळजीपूर्वक देखरेख केली जात आहे.
दिर्घकाळ राहत असलेल्या नागरिकांची परिस्थिती
अनेक पाकिस्तानी नागरिक गेली ८ ते १० वर्षे राज्यात राहत आहेत. काहींनी येथे विवाह केला आहे तर काहींनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्जही सादर केला आहे. चित्रपट, पत्रकारिता, औषधोपचार आणि वैयक्तिक कारणांसाठी आलेल्या नागरिकांमध्ये सार्क व्हिसा धारकांचाही समावेश आहे.
सरकारचा कडक इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, महाराष्ट्र सरकार कोणत्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन खपवून घेणार नाही. “देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही सर्व आवश्यक पावले उचलत आहोत,”